पुणे : देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी उद्घाटन झाले. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
११ ते १५ डिसेंबर २०१९ दरम्यान हे प्रदर्शन मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात भरविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पहिल्या गटात आंध्र प्रदेशमधून आलेले सी. एच. आर. प्रसाद, उस्मानाबादमधून आलेले बाळासाहेब भंडावले, जालन्याचे नारायण देशमुख आणि सुभाष बोराडे, नितीन बोराडे, पांडुरंग बोराडे, हणमंत बोराडे, बबन बोराडे, नारायण अप्पा बोराडे, कोल्हापूरचे अभिजित गंगाधरे, संभाजी पाटील, कुमार पवार, अशोक पाटील, प्रल्हाद पाटील, युवराज पाटील, भरत देवडकर, मेघराज पाटील, अण्णासो पाटील यांचा समावेश होता.
१५ एकर क्षेत्रावर भरलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील कंपन्या सहभागी झाल्या असून, ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक यांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर केली आहेत.
प्रदर्शनस्थळी जाण्यासाठी शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बसस्टॉपपासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.